असे म्हणतात की, “देव तारी त्याला कोण मारी” याचा प्रत्यय लातूर जिल्ह्यातील, औसा शहरातील परंतू सद्या नोकरीच्या निमित्ताने पुणे येथे राहात असलेले भिमाशंकर स्वामी यांना आला. भिमाशंकर स्वामी यांना ८ एप्रिलला कोरोनाची लागन झाली. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीचाही रिपोर्ट पॉझिाटिव्ह आला. अशा परिस्थित त्यांच्या मदतीला त्यांचे भाऊ शिवशंकर स्वामी आले. त्यांनी पुण्यात बेड मिळविण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतू त्यांना बेड मिळत नसल्यामुळे शिवशंकर स्वामी यांनी त्यांना लातूरला हलवण्याचा निर्णय घेतला. दिनांक ९ एप्रिल रोजी भिमाशंकर स्वामी व त्यांची पत्नी यांना लातूरला आणले. त्यांच्या छातीचा स्कॅन केल्यानंतर समजले की, कोरोनाने त्यांचे फुप्फूस २५ पैकी २४ टक्के संक्रमित केले आहे. त्यानंतर त्यांच्या भावाने तातडीने निर्णय घऊन त्यांना लातूर येथील शीतल पाटील यांच्या “व्यंकटेश” हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले.
भिमाशंकर याच्या छातीच्या स्कॅनचा रिपोर्ट स्कोर पंचवीस पैकी चोवीस आला आणि फुप्फूसाने ९० टक्के काम थांबविले होते. रिपोर्ट पाहिल्यावर डॉ. पाटील यांनाही रुग्ण वाचण्याची खात्री वाटत नव्हती. मात्र डॉक्टरांनी त्यांचे प्रयत्न चालूच ठेवले. एवढेच नाही तर रुग्णाच्या नातेवाईकांना धीर दिला आणि उपचार सुरुच ठेवले. सुरुवातीचे दोन दिवस डॉक्टरांनाही यश येत नव्हते. अशा परिथितीत डॉक्टरांनी कशाचीही पर्वा न करता त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांची वाचण्याची शक्यता कमी असतानाही डॉक्टरांनी त्यांच्यावर केलेले उपचारामुळे तिसऱ्या दिवशी त्यांना थोडा आराम वाटू लागला. भिमाशंकर यांची लढाऊ वृत्ती आणि त्याला मिळालेली भावाची साथ या सर्वांमुळे भिमाशंकर अक्षरश: मृत्यूच्या दारातून परत आले.
या काळात रुग्णाचा भाऊ शिवशंकर हे सावलीसारखे आपल्या भावाच्या जवळ होते. कोरोना रुग्णाच्या जवळ सहसा कोणी थांबायला तयार होत नाही. परंतू शिवशंकर हे आपल्या भावाजवळच बसून होते. त्यांना स्वतः बद्दल जराही भीती वाटत नव्हती. त्यांना त्यांच्या भावाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणायचे होते. शिवशंकर यांची वहिनी आणि भाऊ दोघेही संक्रमित असतांना त्यांनी भावाला धीर दिला. मी आहे तू अजिबात काळजी करु नकोस असा विश्वास दिला. त्यांच्या वहिनींना १४ तारखेला डिस्चार्ज मिळाला. आणि भावालाही नंतर तीन दिवसांनी म्हणजे १७ तारखेला घरी पाठविण्यात आले. त्यांचा स्कोर आता शून्यावर आला असून त्यांचे फुफुस नव्वद टक्के काम करीत आहे.
शिवशंकर स्वामी म्हणाले की, माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी डॉक्टर शीतल पाटील हे देवदूत आहेत. त्यांनी काळजीपूर्वक केलेले उपचार आणि मानसिक आधार दिल्यानेच माझा भाऊ आज मरणाच्या दारातून परत आला आहे. आशा काळात नातलग आणि जवळच्या मित्रांनी रुग्णाला जो मानसिक आधार दिला तोच त्याला वाचविणारा ठरला आहे.
रुग्णाच्या मनातली भीती ही त्या आजारापेक्षाही जास्त घातक असून सर्वांनी अशा रुग्णांना मानसिक आधार देणे गरजेचे असल्याचे शिवशंकर स्वामी यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येकाने जमेल तसे कोवीड रुग्नांना व रुग्नाच्या कुटुंबियांना मानसिक आधार दिला पाहिजे. अशी वेळ कोणावरही येवू नये, देव करो आणि हे संकट लवकर टळो. अशा उदाहरणामधून संकटकाळी स्वतःची काळजी घेत इतरांना मदत करण्याची प्रेरणा मिळते.